मासेमारी करताना अंगावर वीज पडून युवकाचा मृत्यू; युवकाचा जागेवर झाला कोळसा

राजगुरुनगर ( पुणे ) : अंगावर वीज पडून ठाकर समाजातील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्याच्या भामा आसखेड धरण परिसरात पाईटच्या रौंधळवाडी गावात घडली.मयत युवक चासकमान धरण परिसरातील वेताळे गावचा आहे. संतोष गुलाब खंडवे (वय २५, रा. वेताळे, ता. खेड) असे नाव आहे.
मयत युवक आणि त्याचे पाच मित्र भामा आसखेड धरणाच्या परिसरातील रौंधळवाडी (पाईट, ता. खेड) येथे सोमवारी (दि २६) मासेमारी करत होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्यावर वीज कोसळली. संतोषच्या अंगावरील कपडे आणि मोबाईल जळून खाक झाले, तसेच त्याच्या उजव्या बाजूचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले. संतोषला त्याच्या मित्रांनी तात्काळ पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंटात नेले.मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनास्थळी पंचनामा मंडल अधिकारी एम,एस सुतार,ग्राम महसूल अधिकारी एम.जी.क्षीरसागर यांनी घटनेचा पंचनामा केला,यावेळी ग्रामपंचायत अधिकारी ए.एन.फुलपगर,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर,माजी उपसरपंच दीपक डांगले,अनिल रौंधळ,विपुल खेंगले,कबीर रौंधळ,हरिभाऊ रौंधळ,नवनाथ डांगले आदी उपस्थित होते.