आळंदीत बालविवाह रोखला;मुलीच्या पतीसह बारा जणांवर गुन्हा दाखल

आळंदी ( पुणे ) : आळंदी येथे बालविवाह केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या पतीसह १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.आळंदी येथे वडगाव रस्त्यावरील गंधर्व मंगल कार्यालयात २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिलिंद सोपानराव वाघमारे ( वय.४५ वर्षे,रा.परभणी ) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गौरव सुभाष मुरक्या (रा.साळवेश्वर नगर, ब्रह्मा-विष्णू महेश अपार्टमेंटच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी) याच्या सोबत बालिका वधुची आई, मामा, मामी (तिघे रा. कारेगाव, पुणे), सासरे सुभाष भोलाराम, सासू, शुभम सुभाष मुरक्या, जाउ, संतोष भोलाराम मुरक्या, प्रमोद भोलाराम मुरक्या (रा. परभणी), तसेच वडगाव रस्त्यावरील गंधर्व मंगल कार्यालयाचे संचालक व इतर सेवा पुरवणारे व्यवस्थापक यांच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद वाघमारे हे परभणी येथील नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा परभणी येथील शहर विभागाचे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. १७ वर्ष पाच महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे गौरव मुरक्या याच्यासोबत संशयितानी लग्न लावून दिले. तसेच इतर संशयितांनी हा बालविवाह करण्यासाठी मदत केली.बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.